जिल्हयातील सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी
सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी.

देशातील महत्वाच्या परीक्षांच्या पेपरफुट प्रकरणी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा म्हणून सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथील आंदोलन व त्यांच्या भूमिकेला पाठींबा देण्यासाठी सातारा येथील भूविकास चौकामध्ये सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने शनिवारी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
यावेळी सोनम वांगूचक यांना पाठिंबा देत दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले या पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजीसुध्दा यावेळी व्यक्त केली.देशातील शिक्षण व्यवस्थेमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या या प्रकारांमुळे संपूर्ण परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणी सर्वाच्च जबाबदारी असलेले केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा किंवा केंद्र शासनाने त्यांना या पदावरुन हटवावे या रास्त मागणीसाठी सोनम वांगचुक यांनी जंतर-मंतर येथे मागील २० दिवसापासून बेमदुत उपोषण सुरु केले आहे. सोनम वांगचुक यांच्या या धाडसी व प्रमाणिक आवाजाला बळ देणेसाठी सातारा जिल्हयातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्यातर्फे शनिवारी भू विकास चौकातील हुतात्मा स्मारकासमोर आत्मक्लेश आंदोलन केले.
यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. त्यात देशात युवक आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणारी कोणतीही व्यवस्था स्वीकारली जावू नये शिक्षण क्षेत्रातील परिक्षांमध्ये पारदर्शक, विश्वासार्ह आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण व्यवस्था उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत.
ही आग्रही मागणी करण्यात आली. या आंदोलनामध्ये शिवाजी जाधव, महारुद्र तिकुंडे, मोहन शिंदे, सुशांत मोरे, हणमंत शिंदे, कैलास कुंभार, महेंद्र बाचल, भारत जगताप, ॲड.मंगेश महामुलकर, एकनाथ सकपाळ, गुलाब बनसोडे, सादिकअली बागवान, गणेश अहिवळे, प्रशांत जाधव, प्रज्वल तिकुंडे, भारत रावळ, संदिप जाधव, विनोद कदम, दत्तात्रय जाधव, धनंजय कदम, सागर भोगावकर हे सहभागी झाले होते.



