खूनाच्या प्रयत्नातील तिघांना तीन वर्षांची सश्रम कैद फिर्यादीस १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई.
खूनाच्या प्रयत्नातील तिघांना तीन वर्षांची सश्रम कैद फिर्यादीस १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई.

प्रतिनिधी तारळे उंब्रज (ता. कराड) – कोणेगाव येथे किरकोळ वादातून तरुणावर चाकू व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करणाऱ्या तिघा आरोपींना कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधिश दिलीप भा. पतंगे यांनी तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा आज दि. ६ रोजी सुनावली. तसेच त्याना दंड न भरल्यास एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तसेच पीडित फिर्यादीला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले.
याबाबत उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोर यांच्याकडून मिळालेली माहिती अशी,
कोणेगाव (ता. कराड) येथे १३ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बाळू नलवडे यांच्या त्रिमूर्ती किराणा दुकानासमोर सदरील घटना घडली होती. फिर्यादी सतीश तुकाराम जाधव (वय २५, रा. कोणेगाव) हा एका विधीसंघर्ष बालकाच्या वागण्याबाबत त्याच्या मामांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, आरोपी अक्षय संतोष पवार (वय २१), नवनाथ शामराव बाईंग (वय ३५) व बापूसाहेब महिपती बाईंग (वय ३४) यांनी त्याचेशी वाद घालत त्याच्यावर हल्ला केला.
वादाच्या दरम्यान आरोपी अक्षय पवार याने “तुला जिवंत ठेवत नाही” असे म्हणत फिर्यादीच्या पाठीवर चाकूने भोसकले, तर इतर दोघा आरोपींनी लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. या हल्ल्यात फिर्यादीला फ्रॅक्चर होऊन तो गंभीर जखमी झाला. फिर्यादीने लगेचच उंब्रज पोलिसांत गुन्हा नोंदवला.
या प्रकरणी उंब्रज पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक ४५८/२०१९ दाखल झाला होता. आरोपींना १४ नोव्हेंबर २०१९ रोजी रात्री अटक करण्यात आली होती. एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी आणि तापसी अधिकारी प्रवीण जाधव, सतीश मयेकर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या सदर गुन्हयाचा तपास उंब्रज पोलीस स्टेशनचे पो.उपनिरीक्षक पी. एस. जाधव यांनी केला. सरकारी बाजूने एम. व्ही. कुलकर्णी यांनी काम पाहिले. मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील व पोलीस उपनिरीक्षक श्री. रवींद्र भोरे यांनी केले.आज, दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश दिलीप भा. पतंगे यांनी निकाल देत आरोपी क्रमांक १, २ व ३ यांना भा.द.वि. कलम ३२४ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.या निकालामुळे गावात आणि पोलिस दलात समाधान व्यक्त केले जात आहे.



